Indian Railways News => Topic started by nikhilndls on Sep 16, 2013 - 18:00:17 PM


Title - ‘शकुंतले’ला बाप्पा पावले
Posted by : nikhilndls on Sep 16, 2013 - 18:00:17 PM

यवतमाळ , म. टा. प्रतिनिधी

सर्वसामान्यांच्या प्रवासाला मोलाची साथ देणारी शकुंतला एक्स्प्रेस मंगळवारी तब्बल तीन महिन्यानंतर प्रवाशांना घेऊन यवतमाळ रेल्वे स्थानकावर आली. त्यामुळे शकुंतला बंद होण्याच्या अफवांना विराम मिळाला आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता मूर्तीजापूर रेल्वे स्टेशनवरून ही रेल्वे निघाली. दुपारी २.३० वाजतादरम्यान यवतमाळला पोहचली. त्यानंतर पुन्हा ४.३० वाजतादरम्यान प्रवाशांना घेऊन मूर्तीजापूरकडे रवाना झाली.

रेल्वेने ' शकुंतला ' येणार असल्याची सूचना न दिल्याने अनेकांना याची माहिती नव्हती. त्यामुळे यवतमाळ रेल्वे स्थानकावर आज काही मोजकेच प्रवासी होते. मात्र यापुढे गर्दी वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्ग खराब झाल्याच्या कारणावरून मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाने शकुंतला एक्स्प्रेस बंद केली होती. पाऊस थांबल्यानंतरही रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत कुठल्याही हालचाली करण्यात न आल्याने प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केला जात होता. याची दखल घेत खासदार भावना गवळी यांनी शकुंतला रेल्वे सुरू करण्याबाबत आवाज उठवला होता. दरम्यान , यवतमाळ येथील स्टेशन मास्तर दामोदर निमकर यांची बदली अकोला येथे केल्याने आता शकुंतला पुन्हा यवतमाळला येणार नाही , अशीही चर्चा सुरू झाली होती. प्रवाशांच्या असंतोषाची दखल घेत मध्य रेल्वेने ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अकोल्याला बदलून गेलेले स्टेशन मास्तर हे सोमवारीच यवतमाळला परतले.

सोयीचे तिकीट

यवतमाळ-मूर्तिजापूर हे अंतर ११३ किमी आहे. बसच्या तुलनेत या रेल्वेचे अत्यंत कमी तिकीट असल्याने प्रवाशांसाठी या रेल्वे प्रवास सोयीचा ठरतो. आज दारव्हाचे तिकीट बसने ५० रुपयांच्या वर आहे. मात्र रेल्वे १० रुपयात प्रवाशांना घेऊन जाते. मूर्तिजापूर बसचे तिकीट १७६ असताना ही रेल्वे १८ रुपयात प्रवाशांना पोहोचवते.