Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jul 29, 2013 - 19:59:49 PM


Title - रेल्वेचा ‘राजधानी’त निष्काळजीपणा - नागपूर
Posted by : riteshexpert on Jul 29, 2013 - 19:59:49 PM

नागपूर , म.टा. विशेष प्रतिनिधी

सिंदी रेल्वेजवळ रेल्वे मार्ग वाहून गेल्याची कोणतीही सूचना प्रवाशांना वेळेत न दिल्यामुळे राजधानी एक्सप्रेसच्या प्रवाशांना जो आर्थिक , शारीरिक व मानसिक त्रास झाला याला उत्तर रेल्वे दिल्ली आणि मध्य रेल्वे नागपूर मंडळाचा निष्काळजीपणा जाबाबदार असून , या गाडीतील प्रवाशांना टोकन म्हणून प्रत्येकी ५०० रु. भरपाई देण्यात यावी , अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

नागपूरचे अविनाश प्रभुणे यांनी रेल्वेचा हा निष्काळजीपणा लक्षात आणून दिला आहे. सिंदी रेल्वे जवळील घटना मोठीच होती त्यामुळे तो मार्ग दुरुस्त करण्यासाठी प्रशासानने प्राधान्य दिले यात आक्षेप नाही. मात्र , रेल्वेचे सर्वच अधिकारी-कर्मचारी या कामावर नव्हते. जे कार्यालयात होते त्यांनी योग्य समन्वय न साधल्यामुळे त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. प्रभुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार , ते स्वतः , सुनील राजदान गाझियाबाद , नवीन सन्याल नवी दिल्ली , सुहास उर्ध्वरेषे नागपूर , बलवंत सिंग चंदीगढ हे प्रवाशी २४ जुलै रोजी १२४३४ हजरत निजामुद्दीन- चेन्नई राजधानी एक्सप्रेसने दिल्लीवरून बी टू कोचने निघाले. २४ रोजी १६.०० वाजता ही गाडी ह. निमाजुद्दीनवरू निघाली. मात्र , गाडी निघताना किंवा निघाल्यानंतरही प्रवाशांना ही गाडी नागपूरला जाणार नाही किंवा गाडीचा मार्ग बदलण्यात येईल अशी कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. सुनील राजदान आणि नवीन सन्याल यांना गोंदियाला जायचे होते. त्यामुळे त्यांनी २३ रोजी तात्काळ कोट्यातून तिकीट खरेदी केले होते. रेल्वेने त्यांना नागपूरपर्यंतचे तिकीट दिले होते. मात्र , सिंदी रेल्वेच्या अपघाताची आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची सूचना अगोदरच दिली असती तर राजधानीचे तात्काळ तिकीट खरेदी न करता अन्य पर्याय शोधला असता. मात्र तिकीट काऊंटरवरही त्यांना कोणी सांगितले नाही. राजधानी एक्सप्रेसच्या आत जाहीर अनाउन्समेन्टची व्यवस्था आहे. हजरत निजामुद्दीनवरून गाडी निघाल्यानंतर टीटीईने तिकीट तपासणी केली. मात्र त्यानेही मार्गात बदलाविषयी काहीही सांगितले नाही. तसे कळले असते तर इटारसी किंवा भोपाळला उतरून नागपूरला पोहचण्याची पर्यायी व्यवस्था केली असती , असे प्रभुणे यांनी म्हटले आहे. मात्र , आपण नागपूरलाच पोहचणार आहोत , हा विश्वास असल्याने २२.३० वाजता पुतण्याला फोन करून ५.२५ वाजता स्टेशनवर घ्यायला येण्यास सांगितले. त्याने रेल्वेच्या वेबसाईटवर चेक केले असता ही गाडी ५.२५ वाजता नागपूर स्थानकावर येणार असल्याचे दर्शवित होते. पहाटे ५ च्या सुमारास आपण उठलो व आता अर्ध्या तासात नागपूरला उतरायचे आहे म्हणून सामान आवरू लागलो तर धक्काच बसला. कारण आमची गाडी भुसावळजवळ उभी होती. अधिक चौकशी केली असता गाडी इटारसी पासून वळविण्यात आल्याची माहिती मिळाली. या प्रकारामुळे सर्वच प्रवाशी संतापले. त्यांचा आवाज ऐकून मोहन चांद नावाचे टीटीई आले व आपल्यालाही गाडीचा मार्ग बदलाची कल्पना नव्हती असे त्यांनी सांगितले. आम्ही त्यांना तक्रार पुस्तिका मागितली. मात्र ती न देताच त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता पहिल्यांदा रेल्वेच्या आत गाडी नागपूरला जाणार नसल्याचे व नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना वर्धा येथे उतरावे लागेल असे जाहीर करण्यात आले. राजधानी एक्सप्रेसने जायचे असल्याने प्रवाशांनी जास्तीचे पैसे दिले होते , पण रेल्वेने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे सारे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे रेल्वेने संबंधित सर्व प्रवाशांना टोकन म्हणून ५०० रु. भरपाई द्यावी व ज्या अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागला , त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रभुणे यांनी केली आहे.