Indian Railways News => Topic started by puneetmafia on Aug 02, 2013 - 00:00:15 AM


Title - रेल्वे-एसटीचा हातात हात
Posted by : puneetmafia on Aug 02, 2013 - 00:00:15 AM

रेल्वे आणि एसटी या दोघीही प्रवाशांच्या मोठ्या लाडाच्या . दोघींचीही सेवा वेगळी आणि पद्धतही वेगळी ; पण वर्धा जिल्ह्यात रेल्वेचा मार्ग वाहून गेल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी या दोन्ही मैत्रिणी हातात हात घालून सज्ज आहेत . रेल्वेने एसटीची मदत घेतली आणि जेथून रेल्वे गाड्या सुटतात , त्या रेल्वे स्थानकावरून एसटी सुटत असल्याचे चित्र पाहता आले .

१९ जुलै रोजीच्या जोरदार पावसामुळे वर्ध्यानजीक रेल्वेचा साडेतीनशे मीटर मार्ग वाहून गेला आणि नागपूर - मुंबई या महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णतः विस्कळीत झाली . नागपूर स्थानकावर हजारो प्रवासी अडकून पडले . जे नागपुरातील प्रवासी होते त्यांनी आपली पर्यायी व्यवस्था करून घेतली पण बाहेरगावचे जे प्रवाशी नागपुरात अडकले होते , त्यांचा प्रश्न होता . हे प्रवासी वर्ध्याला पोहोचले तर तेथून पुन्हा ते पुढचा प्रवास रेल्वेने करू शकणार होते . मात्र , अनोळखी शहरात सामान , मुलं - बाळं , वृद्ध यांच्यासह पर्यायी व्यवस्था शोधणे शक्य होत नव्हते . त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने एसटीला विनंती केली आणि एसटीनेही तत्परतेने थेट रेल्वे स्थानकावरून एसटी सोडण्याची व्यवस्था केली . रेल्वे वाहतूक आता बऱ्यापेकी सुरळीत झाली आहे . मात्र , गेल्या चार - पाच दिवसांत एसटीने अनेक फेऱ्या रेल्वे स्थानकावरून सोडल्या . नागपूर रेल्वे स्थानक ते वर्धा रेल्वे स्थानक अशी ही सेवा सातत्याने पुरविण्यात आली . शुक्रवारीही एसटीने काही गाड्यांची व्यवस्था केली होती . दक्षिणेतून रेल्वेने आलेले काही प्रवाशी वर्धा स्थानकावर उतरले होते . त्यांना नागपूरला यायचे होते . त्यामुळे मग गुरुवारी रात्री १ वाजता वर्धा रेल्वे स्थानकावरूनही अशीच बस नागपूरसाठी सोडण्यात आल्याचे एसटीचे विभाग नियंत्रक राजीव घाटोळे यांनी ' मटा ' ला सांगितले . नैसर्गिक आपत्तीच्या वेळी एसटी व रेल्वेने आपसात चांगला समन्वय ठेवून प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देऊन एक चांगला पायंडा पाडला .