Indian Railways News => Topic started by irmafia on Jul 21, 2013 - 12:01:11 PM


Title - रूळ पाण्यात गेल्याने प्रवाशांची तारांबळ
Posted by : irmafia on Jul 21, 2013 - 12:01:11 PM

मुंबई - शुक्रवारी पावसाने उपनगरीय रेल्वेची चांगलीच परीक्षा घेतली. त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. अनेकांना रेल्वे रुळावरून भर पावसात पायपीट करावी लागली, तर अनेक जण स्थानकातच तासन् तास लोकलची वाट पाहात होते. त्यात इंडिकेटर्स आणि उद्घोषणाही बंद होत्या. रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यांवर आणि परिसरात पाणी साचल्याने पुढे जाण्याचा मार्गही उरला नव्हता. त्यामुळे अनेकांनी कार्यालयात जाण्याऐवजी मिळेल त्या वाहनाने घर गाठणेच पसंत केले.
मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील सेवा पूर्णत: कोलमडली होती. ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने कल्याणहून ठाण्याच्या दिशेने जाणा-या सर्वच लोकल जलदगती मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे कळवा, मुंब्रा स्थानकात अनेक प्रवासी लोकलची वाट पाहात ताटकळत उभे होते. अनेकांनी रस्त्यांने ठाणे गाठण्याचा प्रयत्न केला.
मात्र रिक्षा आणि अन्य वाहने उपलब्ध नसल्याने काहींनी पायपीट करत ठाणे गाठले. कळवा स्थानकाच्या बाहेरही पाणी साचले होते. त्यामुळे स्थानकात येण्याचा मार्गही नव्हता. जे स्थानकात होते त्याना कोणतीही माहिती दिली जात नव्हती, असे दीप्ती जोशी यांनी सांगितले. दरम्यान ठाणे स्थानकात मोठी गर्दी होती. त्यातच गाडय़ा जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिराने येत होत्या.
विरारमधल्या प्रवाशांचे तर मोठे हाल झाले. दुपारी जवळपास दोन तास विरारहून एकही गाडी चर्चगेटकडे रवाना झाली नाही. नालासोपारा स्थानकात पाणी साचले असल्याने विरापर्यंत अनेक गाडय़ा रुळांवरच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे वसईवरून अनेक जण रुळावरून मार्ग काढत विरारला पोहोचले अशी महिती सुधीर सकपाळ यांनी दिली. शिवाय त्यांनी पकडलेली लोकल विरारहून गोरेगावला तब्बल दोन तासांनी पोहोचली. त्यातच पावसाचा जोर जास्त असल्याने वसई, विरार आणि नालासोपारा भागांत रिक्षा सेवाही ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत भरच पडत होती.