Indian Railways News => Topic started by AllIsWell on Oct 04, 2013 - 15:00:32 PM


Title - मानकापूर रेल्वे क्रॉसिंग डेंजर झोन
Posted by : AllIsWell on Oct 04, 2013 - 15:00:32 PM

नागपूर: मानकापूर रेल्वे क्रॉसिंगवर कधीही जा ... डोकं खराब झाल्याशिवाय राहणार नाही . मजबुरी म्हणून या रोडवरून जावे लागते , अशीच नागरिकांची मानसिकता आहे . येथील आरओबीचे ( रेल्वे ओव्हर ब्रिज ) काम सुरू असल्यामुळे बांधण्यात आलेल्या नव्या रेल्वे क्रॉसिंगवर वारंवार ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण होते . त्यामुळे या ठिकाणी भीषण अपघाताची भीती आहे . वाहतूक पोलिस आणि रेल्वे प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे येथे वाहतुकीचा बोऱ्या वाजला असून , या मार्गाने जाणाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे .

छिंदवाडा मार्गावरील दिल्ली - मद्रास रेल्वे लाइनवरील मानकापूर क्रॉसिंगवर सहा महिन्यांपूर्वी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले . त्यामुळे येथील रस्ते वाहतूक बाजूने वळविण्यात आली आहे . त्यासाठी रेल्वे लाइनवर नवीन गेट तयार करण्यात आले . मात्र , या नवीन गेटकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेले दोन्ही बाजूचे अॅप्रोच रोड इतके अरुंद आहेत की , त्यामुळे वाहनांची प्रचंड गर्दी होते .

पोलिस प्रशासन आणि रेल्वेने लक्ष दिले तर ही समस्या काही प्रमाणात सुटू शकते . मात्र , या दोन्ही विभागांना सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाशी काहीच देणे - घेणे नाही अशी लोकांची भावना आहे . पोलिस विभागाने येथे काही वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे . मात्र , त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही . क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूंचे रोड अरुंद असल्याने सारी वाहने एकाच रांगेत उभी राहणे आवश्यक आहेत . मात्र , तसे होत नाही आणि प्रत्येकजण आपले वाहन पुढे दामटण्याचा प्रयत्न करतो , परिणामी ट्रॅफिक जामची स्थिती उद्भवते . सिंगल लेन सिस्टीमचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली तर ही स्थिती आटोक्यात येऊ शकते .

काही उपाय ...

सामाजिक कार्यकर्ते अविनाश प्रभुणे यांनी या समस्येवर काही उपाय सुचविले आहेत . एक तर या मार्गाने दिवसा मोठे ट्रक , ट्रेलर यांना परवानगी नसली पाहिजे . कारण रस्त्याचा बराचसा भाग ही मोठी वाहने व्यापतात व छोटी वाहने अडकून पडतात . दुसरे म्हणजे या ठिकाणी सर्व वाहनांना एका रांगेत उभे राहण्याची सक्ती केली पाहिजे . या सक्तीमुळे कदाचित वाहनांची ​ मोठी रांग तयार होईल , पण ट्रॅफिक जाम होणार नाही , असे त्यांनी ' मटा ' ला सांगितले . जी वाहने रांग तोडून उभे राहतील त्यांच्यावर त्याच ठिकाणी दंड आकारला पाहिजे . त्यासाठी जास्तीचे वाहतूक पोलिस येथे नियुक्त करावे लागतील . पोलिसांनी अशाप्रकारे रांग तोडणाऱ्यांवर दंडाची कारवाई होईल असे आधीच जाहीर करावे व नंतर कारवाई सुरू करावी . त्यामुळे वाहने शिस्तीत उभी राहतील . क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूंनी ५० ते १०० मीटरपर्यंत रोड डिव्हायडर्स लावणेही आवश्यक आहे . मानकापूर रिंग रोड चौकात ट्रॅफिक सिग्नल्स आहेत . मात्र पिक अवर्समध्ये येथील वाहतूक मॅन्युअली नियंत्रित करण्याची गरज आहे , असेही प्रभुणे यांनी सुचविले .

कुणाचा जीव जाण्यासाठी ...

वाहतूक पोलिसांसहच रेल्वे प्रशासनानेही या प्रश्नाकडे लक्ष देणे आवश्यक आहे . बरेचदा येथील गेट १५ ते २० मिनिटे बंद असते . त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहने मोठ्या संख्येत जमा होतात . गेट बंद ठेवण्याचा कालावधी कमी करता आला तर ते अधिक योग्य होईल . एखादे वाहन गेटमध्येच बंद पडले तर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याची माहिती त्वरित पोलिसांना दिली पाहिजे . कागदोपत्री आताही कदाचित हे सारे होत असले पण , ट्रॅफिक जाम हे मानकापूर क्रॉसिंगवरचे वास्तव आहे . एखाद्या दिवशी मोठा अपघात होऊन कुणाचा जीव जाण्याआधी पोलिस आणि रेल्वे यांनी या समस्येवर उपाय शोधावा , अशी नागरिकांची मागणी आहे .