Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jul 26, 2013 - 12:00:26 PM


Title - नागपूर-वर्धा मार्ग रखडलेलाच!
Posted by : puneetmafia on Jul 26, 2013 - 12:00:26 PM

दोन पॅसेंजर रद्द, अनेक गाड्यांना उशीर
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
सिंदी (रेल्वे) आणि तुळजापूर या स्थानकांदरम्यान रुळाखालील पूल वाहून गेल्याच्या घटनेला पाच दिवस झाले तरी नागपूर-वर्धा हा 'अप' मार्ग अजूनही रखडलेलाच आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक वर्धा-नागपूर या 'डाउन' मार्गाने सुरू आहे. एकाच मार्गाने दोन्ही बाजूंची वाहतूक होत असल्याने अनेक गाड्या उशिराने धावत आहेत, तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
१९ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे वर्ध्याजवळ सिंदी आणि तुळजापूर स्थानकांदरम्यान रुळाखाली असलेल्या एका नाल्यावरील पूल वाहून गेला होता. गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने कंट्रोल रूमला माहिती देऊन दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली. घटना घडताच मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तंत्रज्ञांसह घटनास्थळी रवाना झाले आणि युद्धस्तरावर या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दोन दिवसात 'डाउन' मार्ग सुरू झाला, पण 'अप' मार्गाच्या दुरुस्तीचे काम अजूनही झाले नाही. त्यामुळे आज सलग पाचव्या दिवशीही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. 'डाउन' मार्गाने वाहतूक होत असली तरी तेथे गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. इटारसीकडून बुधवारी येणाऱ्या सर्व गाड्या इटारसी, खंडवा-भुसावळ-बडनेरा-वर्धा- भल्लारशा मार्गाने चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मार्ग पुन्हा क्षतिग्रस्त?
वर्धा-नागपूर या दुरुस्त झालेल्या अप मार्गावरील माती वाहून गेल्याने तो पुन्हा क्षतिग्रस्त झाल्याची चर्चा बुधवारी दिवसभर होती. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मात्र याचा स्पष्ट इन्कार केला. दुरुस्त झालेल्या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. डाउन मार्गाच्या दुरुस्तीसाठी ९०० कामगार झटत आहेत. लवकरात लवकर हा मार्गही सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.