Indian Railways News => Topic started by puneetmafia on Sep 17, 2013 - 20:56:49 PM


Title - ट्रॅकमन ठरला देवदूत
Posted by : puneetmafia on Sep 17, 2013 - 20:56:49 PM

पहाटेच्या साखरझोपेत असलेले प्रवाशी. भरधाव गाडीच्या कर्णकर्कश ब्रेकच्या आवाजामुळे खळबळून जागे झाले. आजचा दिवस कदाचित त्यांच्यासाठी शेवटचा ठरला असता. मात्र ट्रॅकमनने सजगता दाखविली आणि मुंबई-अमरावती एक्स्प्रेसचा भीषण अपघात टळला.

समाधान खंडेराव असे ट्रॅकमनचे नाव आहे. समाधान हे शेगाव रेल्वे स्थानकात ट्रॅकमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पारसनजीक असलेल्या मनारखेडच्या छोट्या पुलावर (मोरी) तैनात करण्यात आले होते. रविवारी सांयकाळी ६ ते सोमवारी पहाटे ६ वा‌जतादरम्यान त्यांची ड्युटी होती. रविवारी रात्रभर परिसरात मुसळधार पाऊस झाला. पहाटे पाऊस बंद झाला. सकाळी चार आणि पाच वाजताची गाडी पुलावरून गेली. साडेपाचच्या सुमारास आझाद-हिंद एक्स्प्रेस या पुलावर पोहचली. भरधाव गाडीचे शेवटचे दोनतीन डबे पुलावर असतानाच अचानक पुलाची डाऊन मार्गावरील भिंत कोसळली. गाडी पास झाल्यानंतर समाधान खंडेराव यांनी पुलाची पाहणी केली. तेव्हा भिंत कोसळल्यामुळे सुमारे आठ मीटरपर्यंत रेल्वे रुळाखालील गिट्टी- मातीचा भराव पूर्ण वाहून गेला होता. तसेच रेल्वे रुळ अधांतरी लटकत होते. त्याचवेळी मुंबई-अमरावती एक्स्प्रेस पुलावरून जाण्याची वेळ झाली होती. ट्रॅकमन खंडेराव यांच्याकडे मोबाइल नसल्याने ते तत्काळ अधिकाऱ्यांना संपर्क करू शकत नव्हते. मात्र धोका टाळण्यासाठी त्यांनी रेल्वे प्रशासनाने दिलेले प्रशिक्षणाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रेल्वे रुळावरून शेगावकडे धाव घेतली. सुमारे ७०० मीटर अंतरावर त्यांनी ' फटाका ' रेल्वे रुळावर बसविला. लाल बावटा हलवून चालकाचे लक्ष वेधले. अपेक्षेप्रमाणे गाडीचे इंजिन फटाक्यावरून जाताच तो फुटला आणि चालक सावध झाले. इमरजन्सी ब्रेक लावला. ट्रॅकमनने चालक आणि गार्डला संभाव्य धोक्याची सूचना दिली. तिघांनी खचलेल्या रेल्वे रुळाची पाहणी केली. तेव्हा गाडी थांबली नसती तर मोठी दुर्घटना झाली असती असे मत चालकाने व्यक्त केले.

जीटीमधून धूर निघाल्याने खळबळ

रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या जीटी एक्स्प्रेसच्या एका बोगीखालून अचानक धूर निघू लागल्यामुळे सोमवारी खळबळ उडाली. ही घटना दुपारी १२.२५ वाजता प्लॅटफॉर्म क्र. १ वर घडली. जीटी एक्सप्रेस या प्लॅटफॉर्मवर उभी असतानाच एस-१० या बोगीच्या खालच्या भागातून धूर निघू लागला. त्यामुळे गाडीला आग लागली असे वाटून प्रवाशी सैरावैरा पळू लागले. गाडीत बसलेले प्रवासीही उतरू लागले. त्यामुळे आरपीएफ व जीआरपीनेही घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे कर्मचारीही आले. त्यांनी ही बोगी दुरुस्त केली. त्यानंतर १२.५५ वाजता गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.