Indian Railways News => Topic started by puneetmafia on Aug 25, 2013 - 20:57:33 PM


Title - झुरळांनी रोखली दुरांतो
Posted by : puneetmafia on Aug 25, 2013 - 20:57:33 PM

नागपूर

नागपूर-मुंबई प्रवासासाठी लाडाची ठरत असलेली दुरांतो एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेचे कारण झुरळांचे आक्रमण आहे. त्यांच्या उपद्व्यापामुळे पाच-दहा नव्हे तर तब्बल ५० मिनिटे गाडी रोखली गेली. प्रवाशांच्या तक्रारीमुळे अवघ्या रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. विनंती केल्यानंतर अखेर मुंबईहून नागपूरकडे निघालेली ही गाडी निघाली. सकाळी नागपूरला पोहोचताच गाडीची स्वच्छता करण्यात आली. यापुढे गाडीत झुरळ आढळणार नाही , अशी ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली. यापूर्वीही दुरांतोच्या स्वच्छतेबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. तर , तीन महिन्यांपूर्वी राजधानी एक्स्प्रेसही झुरळांनी रोखून धरली होती , हे विशेष.

मुंबईच्या छत्रपती टर्मिनसहून शुक्रवारी सायंकाळी दुरांतो निघाली. एक्स्प्रेसने बऱ्यापैकी वेग घेतला असतानाच दबा धरून बसलेली अनेक झुरळे मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडली. ते प्रवाशांच्या पायांवर , अंगावर व ठेवलेल्या सामानांवर मोकळेपणाने फिरू लागले. इगतपुरीला गाडी पोहोचेपर्यंत रात्र झाली. तोवर झुरळांनी बऱ्यापैकी अनेक डब्यांमध्ये अतिक्रमण केले होते. त्यांनी चांगलाच उच्छांद मांडला होता. अखेर त्यांचा त्रास असह्य झाल्याने मूळचे नागपूरकर असलेले व सध्या मुंबईत राहणारे बंटी उके यांनी याप्रकरणाची तक्रार गाडीतील तिकीट तपासणीसाडे केली. ते या गाडीतील थ्री टायर वातानुकूलित डब्यातील बी-२ या डब्यात होते. तपासणीसाने डब्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यास बोलावून स्वच्छतेचे आश्वासन दिले. भुसावळला थांबताच डब्याची स्वच्छता होईल , अशी ग्वाही दिली. गाडी वेगाने पुढे जात मध्यरात्री अडीचच्या सुमारास भुसावळ स्थानकात पोहोचली. स्थानकावर गाडी थांबली. मात्र , रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही स्वच्छता करण्यात आली नाही. वारंवार याकडे स्थानकातील कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकासही कळविले गेले. कुणीही लक्ष देत नसल्याने उके यांच्यासोबत इतरही प्रवासी संतापले. रमेश भंडारी , प्रकाश कटारीया , प्रवीण ओसवाल , सचिन संगेवार , राजेश मुक्कदम आदींनी उके यांच्यासह लेखी तक्रार दिली. गाडीने भुसावळ सोडले. एक कर्मचारी झुरळ मारण्याचे हिट घेऊन आला. मात्र , त्यात काही नव्हते. त्यामुळे प्रवासी पुन्हा संतापले. वरणगाव येण्यापूर्वीच उकेंनी गाडीची साखळी खेचली व गाडी रोखून धरली. सर्वच डब्यांतून तक्रारी वाढल्या. ' रेल्वेचे कर्मचारी व सुरक्षा दलाच्या जवानांनी बसून प्रवास करून अनुभव घ्यावा ' असे सुनावण्यात आले. गाडी जागची हलू देणार नाही , अशी ठाम भूमिका प्रवाशांनी कायम ठेवली. ही माहिती भुसावळ मंडळास मिळताच तेथील रोकडे नावाचे नियंत्रक डब्यात शिरले. त्यांनीही प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ' गाडीची स्वच्छता करण्यात दुर्लक्ष करणाऱ्यास सेवेतून बडतर्फ करा ' अशी मागणी करण्यात आली. संतापलेल्या प्रवाशांना शांत करण्यात आले. अखेर नागपुरात स्वच्छता करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर प्रवासी शांत झाले. नागपूर येईपर्यंत मात्र प्रवासी रेल्वे प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या उद्दामपणाच्या नावे बोटे मोडत राहिले.