Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 24, 2013 - 06:01:04 AM


Title - कोकणात तुफान पाऊस, रेल्वे विस्कळीत-- कोकण
Posted by : railgenie on Jul 24, 2013 - 06:01:04 AM

रत्नागिरी

मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. निवसर ते आडवली दरम्यान रुळाखालच्या भरावाला तडे गेले असून भराव खचल्याने या मार्गावरची स्थिती धोकादायक बनली आहे. मात्र तात्पुरती मलमपटटी करत या रेल्वेमार्गावरुन अत्यंत धिम्या गतीने गाडी पुढे काढून रेल्वेसेवा बंद न पडता ती सुरु ठेवण्यात आली आहे. ही स्थिती गेले तीन दिवस दिवसरात्र सुरु आहे. परिणामी रेल्वेगाडया दोन तासाने विलंबाने धावत आहेत.

गेले पाच दिवस कोकणात पावसाचे थैमान सुरु आहे. सूर्यदर्शन नाही. नदी - नाले तुडुंब भरुन वाहत असून पूरस्थिती नसल्याने महामार्ग सुरळीत आहे. संगमेश्वर सखल भाग खाडीपट्ट्यामध्ये जलमय झाला असला तरी शेती व घरांच्या पडझडी व्यतिरिक्त हानी नाही.

खेड, चिपळूण, गुहागरचा सखल भाग जलमय झाला आहे. लांजा येथील काजळी नदीला पूर आला असून संपूर्ण ग्रामीण भाग जलमय झालेला आहे. स्थानिक वाहतूक विस्कळीत झाली असून शालेय विद्यार्थ्यांचा पट कमी आहे.

रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावरील वसाहतीत घबराट आहे. मांडवी किनाऱ्यावरच्या तीन घरांमध्ये काल रात्री पासून पाणी घुसल्याने त्यांना अन्यत्र आसरा घ्यावा लागला आहे. पावसामुळे शेतीची कामे जोरात चालू असून चिखल पाण्याचा फटका तिघा जणांना बसला आहे. त्यांना लेप्टो झाल्याचे निष्पण झाले असून त्यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात सुरु आहे.