Indian Railways News => Topic started by railenquiry on Aug 02, 2013 - 06:00:35 AM


Title - LTT गाठण्याचा ‘रिक्षा’जाच संपणार
Posted by : railenquiry on Aug 02, 2013 - 06:00:35 AM

मुंबई

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) गाठण्यासाठी प्रवाशांची होणारी दैना दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने योजना आखली आहे. आडमार्गावरील एलटीटीकडे जाण्यासाठी मुजोर रिक्षा- टॅक्सीचालकांमुळे प्रवाशांना अनेक समस्या येत असल्याने एलटीटी ते कुर्ला व कुर्ला ते टिळकनगर स्टेशन असा 'ट्रॅव्हलेटर' (सामानासह उभे राहण्याचा सरकता पट्टा) उभारण्याची योजना आहे. 'एस्कलेटर'प्रमाणे 'ट्रॅव्हलेटर' सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना अवघ्या सात ते आठ मिनिटात एलटीटी गाठणे शक्य होणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर असणाऱ्या ट्रॅव्हेलेटरप्रमाणे मध्य रेल्वेवर प्रथमच ट्रॅव्हलेटर लागणार आहे. प्रवाशांना कुर्ला स्टेशनहून एलटीटीकडे जाणे प्रचंड त्रासाचे असून रिक्षा व टॅक्सीचालकांकडून होणारी लूट व अन्य पर्यायी सुविधांच्या अभावामुळेच हा तोडगा उपयुक्त ठरणार आहे. एलटीटी-कुर्ला-टिळकनगर दरम्यान हा ७०० मीटर लांबीचा ट्रॅव्हलेटर असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या सात ते आठ मिनिटांत एलटीटी अथवा कुर्ला गाठता येईल, अशी माहिती​ मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी दिली.

दोन वर्षे थांबा

या ट्रॅव्हेलेटरसाठी नऊ कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेत केवळ भोपाळ येथे अबिदगंज येथे ट्रॅव्हलेटर आहे. त्यानंतर दुसरा ट्रॅव्हलेटर मुंबईत सुरू होत आहे. सांताक्रूझ ते चेंबूर या लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यावरच हे काम होऊ शकणार असल्याने अजून दीड ते दोन वर्षे लागतील. ट्रॅव्हलेटर झाल्यास एलटीटी हे जागतिक रेल्वे स्टेशन होऊ शकेल. सध्या येथून ५० ते ५५ गाड्या सुटतात व रोज सुमारे सव्वा लाख प्रवासी येथून प्रवास करतात. एलटीटीची नऊ एकर जागा रेल्वेच्या मालकीची आहे. परळ टर्मिनस झाल्यास त्यानंतर एलटीटीचे महत्त्व अधिक वाढणार आहे.