| Indian Railways News => | Topic started by railenquiry on Jun 02, 2013 - 18:00:31 PM |
Title - जनसाधारण बुकिंग केंद्रांना प्रतिसाद वाढलाPosted by : railenquiry on Jun 02, 2013 - 18:00:31 PM |
|
|
मुंबई - मध्य रेल्वेवर प्रवाशांना सहज आणि लवकरात लवकर तिकीट मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनसाधारण तिकीट बुकिंग केंद्रांना (जेटीबीएस) सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र आता या केंद्रांना प्रवाशांनीच प्राधान्य दिले आहे. जेटीबीएसमधून तिकीट खरेदी करताना एक रुपया अधिक मोजावा लागतो. तरीही प्रवाशांकडून या योजनेला प्रतिसाद वाढत आहे. दरम्यान, एटीव्हीएम प्रणालीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे दिसते. त्याऐवजी ते रेल्वे स्थानकांत खिडकीवरून तिकीट घेणे पसंत करत आहेत. मध्य रेल्वेच्या एका निरीक्षणातून हे समोर आले आहे. तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी व्हावी, यासाठी मध्य रेल्वेवर सीव्हीएम कूपन प्रणाली सुरू करण्यात आली होती. याला २०१० आणि २०११ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रणालीच्या माध्यमातून २०१० ला २ लाख तर २०११ मध्ये ३ लाख तिकिटे दररोज विकली जात होती. मात्र या यंत्रात येणारे बिघाड आणि प्रवाशांच्या तक्रारींनंतर सीव्हीएम कूपन बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यानंतर एटीव्हीएम तिकीट प्रणाली मध्य रेल्वेने आणली. त्यासाठी सध्या २५० पेक्षा जास्त यंत्र बसवण्यात आली आहेत. मात्र गेल्या चार वर्षाची आकडेवारी पाहता, सीव्हीएम कूपनच्या तुलनेत एटीव्हीएमला मिळालेला प्रतिसाद अल्प आहे. २०१० साली या माध्यमातून दिवसाला ३० हजारच तिकिटे विकली जात होती. तब्बल चार वर्षानी हा आकडा एक लाखाच्या आसपास गेला. गेल्या दोन वर्षापासून अस्तित्वात आलेली जेटीबीएस तिकीट प्रणाली लोकांच्या पसंतीला उतरत आहे. सध्या मध्य रेल्वेवर १४० जेटीबीएस केंद्र आहेत. २०१२ साली यातून रोज ५० हजारांच्या आसपास तिकीट विक्री होत होती. तर २०१३ मध्ये हा आकडा दुप्पट झाला असून, आता रोज एक लाख तिकिटे विकली जात आहेत. विशेष म्हणजे २०१० आणि २०११ मध्ये या माध्यमातून केवळ हजार ते दीड हजार तिकिटे दररोज विकली जात होती, मात्र आता एक रुपया अधिक देऊनही प्रवासी या तिकीट प्रणालीकडे वळत आहेत. |