Indian Railways News => Topic started by RailXpert on Aug 20, 2013 - 11:58:32 AM


Title - ट्रेन अपघात: मृतांची संख्या ३७
Posted by : RailXpert on Aug 20, 2013 - 11:58:32 AM

पाटणा

बिहारमधील खगडीया जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या ३७ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना बिहार सरकारने प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

प्रसिद्ध कात्यायनी मंदिरापासून जवळच असलेल्या धमारा रेल्वेस्थानकात हा अपघात झाला. अपघातात आणखी १८ भाविक गंभीर जखमी झाले असून तब्बल पाच तासांनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात तसेच अपघातानंतर मदतकार्यात झालेला उशीर यामुळे भाविक तसेच गावकऱ्यांच्या संतापाचा स्फोट झाला आहे.

राज्यराणी एक्स्प्रेसमधील दोनही ड्रायव्हरना गाडीतून खेचून बाहेर काढत बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्याचवेळी राज्यराणी एक्स्प्रेस पेटवून देण्यात आली असून गाडीचे चार डबे जळून खाक झाले आहेत. स्थानकात उभ्या असलेल्या एका पॅसेंजर गाडीलाही आग लावण्यात आली आहे. काही रेल्वे अधिकाऱ्यांना आंदोलकांनी डांबूनही ठेवले असून तणाव अजूनही कायम आहे.

जमावावर नियंत्रण आणण्यात पोलीस असमर्थ ठरत असून सुरक्षेच्या कारणावरून या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हॉर्न वाजवला असता तर...

राज्यराणी एक्स्प्रेसला धमारा रेल्वेस्थानकात थांबा नाही. त्यामुळेच हा भयंकर अपघात घडला. प्रत्यक्षदर्शीच्या मते ही गाडी धमारा रेल्वे स्थानकातून जात असताना हॉर्नही वाजवण्यात आला नाही. शिवाय गाडी ताशी ८० कि.मी. च्या वेगाने जात होती. गाडीने हॉर्न वाजवला असता तर अनेक भाविकांचे प्राण वाचले असते.